कालीसरारच्या भिंतीला गळती

Shabd Sandesh
0
दरवर्षी धरणाला पडते कोरड

देखभाल दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शब्दसंदेश न्यूज सालेकसा, दि.१२: राखीव जलसाठा ठेऊन पिण्याच्या पाण्यासह शेतीला सिंचनासाठी संकटकाळात उपयोगी पडणारे सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणाच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढल्याने पाण्याच्या अपव्यय होत असून धरण फुटण्याचा धोकादेखील वाढला आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेलगत बिजेपार ग्रामपंचायतच्या हद्दीत कालीसरार धरण आहे. या धरणाखालून वाहणारा नाला सालेकसा आणि देवरी तालुक्याला विभाजित असलेल्या या प्रकल्पातून सिंचन करण्यासाठी स्वतंत्र कालवे नाही. या धरणाच्या पाण्याची गरज पडल्यास पाणी थेट पुजारीटोला धरणात सोडले जाते. तसेच गरजेनुसार पाण्याचे वितरण केले जाते. परंतु, या धरणाच्या देखभाल व दुरुस्तीकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने येथील पाणी वापरात कमी व व्यर्थच जास्त जाते.

लाख मोलाचे पाणी दरवर्षी काही च उपयोग न करताच संपून जाते. परंतु, बाष्पीभवन होऊन पाणी कमी झाले असे उत्तर येथील संबंधित विभागाचे कर्मचारी देतात. एखाद्या वर्षी येथील पाण्याचा उपयोग केला नाही तरी पाण्याची पातळी अगदी ३० ते ३५ टक्क्यापर्यंत खाली येते. अर्थात लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते, हे कुणीच नाकारू शकत नाही. परंतु, लिकेजकडे सतत दुर्लक्ष केल्यास धरण फुटण्याचाही धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कालीसरार धरणाला एकूण ४ दरवाजे असून १ टीएमसीपेक्षा जास्त पाणी साठवण करण्याची क्षमता या धरणात आहे. जेव्हा या धरणातून पाणी सोडले जाते, तेव्हा डाव्या बाजूच्या भिंतीला असलेल्या लिकेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. अशात लिकेज आणखी मोठा झाला तर धोकाही वाढेल. येथीलपाणी सुरक्षित राहिलेतर दोन्ही हंगामात २ हजार हेक्टर शेतीला भरपूर सिंचन होऊ शकते.

      नक्षलग्रस्त भागामुळे दुर्लक्ष

कालीसरार धरणाचे पाणी विशेष करून पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाते. परंतु, उन्हाळा येईपर्यंत धरण अनेकदा रिकामे होते. अशातच या धरणाचे पाणी शेवटपर्यंत संग्रहित व सुरक्षित राहावे म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. नक्षलग्रस्त भागात असलेल्या या धरणाच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देणे आता आवश्यक झाले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)