नमो शेतकरी योजनेचा सरकारला विसर; शेतकऱ्यांना हप्ता मिळालाच नाही

Shabd Sandesh
0

आश्वासन दिलेच का? शेतकरी संतप्त
महाराष्ट्र शासन नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
गोंदिया शब्दसंदेश न्यूज, दि.२३

शेतकरी जे मागतो, ते सरकार देत नाही आणि जे मागितले नाही ते देण्याचा प्रयत्न करते, अशा शब्दांत राज्यातील शेतकरी सध्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत. निमित्त आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या 'नमो शेतकरी योजने'चे विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करत सुरू झालेल्या या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला; मात्र निवडणुकीनंतर एकही हप्ता न मिळाल्याने सरकारला या योजनेचा विसर पडला की काय, असा संतप्त सवाल बळीराजा विचारत आहे.
केंद्र सरकारच्या 'पीएम किसान योजने'च्या धर्तीवर, ज्याद्वारे शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये मिळतात, त्याच धर्तीवर राज्य शासनाने 'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजना सुरू केली. यानुसार, पीएम किसान योजनेच्या सहा हजारांव्यतिरिक्त राज्य सरकारकडूनही वर्षाला सहा हजार रुपये, म्हणजेच एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही योजना मागितली नसतानाही, विधानसभा निवडणुकीत मतांचा फायदा व्हावा, या हेतूने योजनेचे आमिष दिल्याचा आरोप होत आहे. निवडणुकीपूर्वी पहिला हप्ता जमाही झालाः पण त्यानंतर मात्र शांतता आहे.
सध्या खरीप हंगामात शेतकरी निसर्गाच्या अवकृपेचा सामना करत आहे. दुबार पेरणीचे संकट, वाढलेला लागवड खर्च यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत 'नमो शेतकरी योजने'चे पैसे खात्यात जमा झाल्यास शेतीकामांना हातभार लागेल, खते-बियाणे खरेदीसाठी उपयोग होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. योजनेच्या नावाला साजेसा सन्मान तेव्हाच मिळेल, जेव्हा ती वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. निवडणूक संपली आणि सरकारला योजनेचा विसर पडला, हे योग्य नाही. केंद्र सरकार 'पीएम किसान'चे हप्ते नियमित देत असताना राज्य सरकारला काय अडचण आहे? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शासनाने तातडीने 'नमो शेतकरी योजने'चा पुडील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. जेणेकरून अडचणीत सापडलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळू शकेल.

शासकीय धोरण आणि शेतकऱ्यांचे मरण

सध्या पाऊस झालेला आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. परंतु, शासन फक्त घोषणांचा पाऊस करत आहे. शेतकऱ्यांच्या पदरात मात्र घोषणा सोडून काहीच पडत नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. बाजारपेठेमध्ये शेतमालाची व्यापाऱ्यांकडून लूट होत आहे. सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. दुष्काळ अतिवृष्टी रोगराई अशा अनंत अडचणीतून शेतकरी शेती करत आहे. कर्ज घेतल्याशिवाय शेतकऱ्याला शेती करणे आता शक्य होत नाही. पिकवलेल्या शेतमाला भाव मिळत नाही त्यामुळे घेतलेले कर्ज भागवता येत नाही आणि सरकार केलेल्या घोषणा अंमलबजावणी करत नाही. शेतकरी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याकडे डोळे लावून बसला आहे. पण सरकारला दया येत नाही. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मरण होत असल्याची टिका आता शेतकरी वर्गातून केली जात आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)