हजारो वजन काटे पडताळणी विना; ग्राहकांची सर्रास फसवणूक...
शब्दसंदेश न्यूज देवरी, दि.२२
रात्रीच्या स्वयंपाकातील भाजीपाल्यापर्यंत खरेदी केलेला माल खरोखरीच योग्य मोजमाप झालेला आहे का? त्या वजन काट्यातून तो मोजला गेला तो काटा प्रमाणित आहे का? या प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता, हजारो वजन मापे पडताळणी विना असून विक्रेत्यांवर विश्वास ठेवूनच हा सगळा व्यवहार सुरू असल्याची बाब समोर आली आहे. यातून अनेकांकडून ग्राहकांची सर्रास फसवणूक होत असल्याची शक्यता आहे.
राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि वैद्यमापन शास्त्र यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या तपासणीत अनेक व्यापाऱ्यांवर नियम भंगाचे खटले दाखल करण्यात आले आहे. या व्यापाऱ्यांनी वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचे मुद्रांकन व पडताळणी केलेली नसतात. वजन काट्याची तपासणी आणि मुद्रांक दरवर्षी करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र बहुतांश व्यापारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. विभागाने काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली असली तरी, तपासणीसाठी अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत. असा आरोप अनेक व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.
ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने अद्यापही मोठ्या प्रमाणात सुधारणा आवश्यक असल्याचे स्पष्ट होते. नियमांचे पालन करून वजन काट्यांची वेळेवर पडताळणी न केल्यास ग्राहकांच्या आर्थिक शोषण रोखणे अशक्य आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेत कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी ग्राहकाकडून होत आहे.
वजन मापाची भूलथापा थांबवण्याची गरज असून पॅक बंद वस्तूमधील वजन, किंमत व एक्सपायरी बाबत ग्राहकांची फसवणूक गंभीर बाब आहे. एक लिटर ऐवजी कमी वजनाचे पाऊच तेच दर लावून विकले जात आहेत. वजन माप निरीक्षकांनी बाजारातील पॅकिंगवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकांनी सतर्क राहून प्रत्येक खरेदी वेळी वजन, माप, एमआरपी व अंतिम मुदत तपासावी. अशा फसवणुकीविरोधात कायदेशीर पावले उचलणे आवश्यक आहे.