संदेश मेश्राम(देवरी), दि.१३
विधानसभा निवडणुकीच्या बिगुल वाजला आणि सोशल मीडिया कमालीचा ऍक्टिव्ह झाला. एरवी ओसाड व भकास दिसणारे व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक व ट्विटर वर व्यक्ती स्वातंत्र्य,मत स्वातंत्र्याची पायीमल्ली करून सोशल मीडियावर कमालीचे तुटून पडले आहेत. विधानसभा निवडणुकीला तमाशाचा फड समजून टाकण्यात येणाऱ्या पोस्ट वात्रटपणा या सदराखाली मोडत असून, यामुळे सुद्धा मतदार कमालीचे बेजार झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
निवडणूक काळात उमेदवार सुद्धा विरोधक उमेदवाराचा, चिन्हाचा आदर करतात. वैयक्तिक टीका निवडणूक चिन्हाच्या अनादर न करता, विरोधी पक्ष व विरोधी उमेदवारांच्या धोरणा विरोधात बोलून आपणच सबळ असल्याचे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात.
या उलट मात्र अनेक छोटभैय्ये, चाटूगिरी करणारे अतिउत्साही कार्यकर्ते मात्र या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर अक्षरशः राजकीय वात्रटपणा करण्यासाठी शर्यतीत उतरल्याने मोठा गोंधळ उडू लागल्याचे भयावह चित्र दिसू लागले आहे. यामुळे मतदारांमध्ये निवडणुकीबाबत नकारात्मकता पसरून मतदानाचा टक्का गोत्यात येण्याची जास्त शक्यता असून, याचा फटका या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या पक्ष व उमेदवारांस बसण्याची शक्यता सुज्ञ मतदार व्यक्त करताना दिसतात.
या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मतदानाचा टक्का वाढविणे, आपला पक्ष व उमेदवार यांच्या ध्येय धोरणाचा प्रचार प्रसार करणे, यासाठी कमी व विरोधी पक्ष उमेदवार, अपक्ष यांच्या चिन्हाचा अपमान करणे, वैयक्तिक टीका करणे, निंदा नालस्ती करणे, वैयक्तिक रोष दाखविणे यासाठी अधिक होत असून, यामुळे निवडणूक संपल्यानंतरही कलह वाढणार असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
यात व्हाट्सअप ग्रुप वात्रटपणाच्या विळख्यात गोवले गेले असून, अनेकांनी एकतर या काळात स्वतःला सोशल नेटवर्किंग मधून बाहेर काढणे पसंत केले आहे.
मत स्वातंत्र्याच्या अधिकार सर्वांना आहे मात्र तो संविधानाचे अधीन राहून आहे हे छटभय्ये, चाटुगिरी करणारे अति उत्साहाचे आहारी जाऊन विसरतात. व यातून आपल्या उमेदवाराचे वय लोकशाहीचे मोठे नुकसान तर करतातच, अन संविधानाचा अवमान सुद्धा करतात हे जाणकारांना वाटल्यास नवल नसावे.