शब्दसंदेश न्यूज गडचिरोली, दि.२६: जिल्ह्यात धान शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला होता. परंतु, सहा महिन्यांच्या कालावधीनंतरही शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही.
बोनसच्या रकमेचा निधी सबंधित विभागाला प्राप्त झाल्याची माहिती असतानाही, शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करण्यात विलंब का होतोय ? हा प्रश्न शेतकरी प्रशासनाला विचारत आहेत.
पावसाळ्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे. पण शेतकऱ्यांकडे पुरेसा निधी नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. जिल्हा पणन विभागाने सांगितले आहे की, शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच बोनस रक्कम जमा केली जाईल, परंतु जवळपास दहा दिवस लोटल्यानंतरही रक्कम खात्यात जमा झालेली नाही. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना बोनसच्या रकमेची अपेक्षा असून, त्यांच्या शेतीच्या कामकाजाला वेग यावा यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर बोनस रक्कम खात्यात जमा करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली होती आणि त्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस मिळण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, नोंदणी केल्यानंतरही रक्कम खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा आशावाद कमी झाला असून, प्रशासनाकडून त्वरित कार्यवाहीची अपेक्षा आहे. बोनस मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने या समस्येवर त्वरित लक्ष देऊन, बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.