शेतकऱ्यांच्या खिसा होणार हलका!
शब्दसंदेश न्यूज देवरी, २१ जून
यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी बी-बियाणांची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. काही प्रमाणात पाऊस झाल्याने नागरणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, यावर्षी मागील वर्षी पेक्षा बियाण्यांच्या किमतीमध्ये दहा टक्क्याने वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप पिकाबाबतचे नियोजन भरकटलेले असून, शेतकऱ्यांची अर्थकोंडी होताना दिसत आहे. परिणामी, शेतकरी हतबल झाले आहेत.
कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. अशातच शेती करिता लागणारा उत्पादन खर्च वाढल्याने व शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या गुंता वाढत असून शेती परवडण्यासारखी राहिलेली नाही. धानाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा शासनाने हमीभावावर नाहीच्या बरोबर वाढ केली. तर बियाण्यांच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने शासनाच्या धोरणात शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
महागड्या व नामांकित कंपनीचे बियाणे परवानाधारक कृषी केंद्रातून घेतल्यानंतरही उत्पादन निघाल्यावर आपली फसगत झाल्याची अनेक प्रकरणे उघड की शेतात तेव्हा शेतकऱ्यांना मनस्ताप शिवाय काहीही मिळत नाही.
मजुराच्या दरातही वाढ
खरीप हंगामाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांनी बँक, महिला बचत गटाच्या माध्यमातून पैशांची तजवीज करताना दिसत आहेत. मात्र, बियाणे व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती तर मजुरांचीही मजुरी दुपटीने वाढल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.
केंद्र चालकांची वाढली डोकेदुखी
कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत बियाणे वितरण विक्री करण्यासाठी साधी पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. शासनाच्या वतीने विविध योजना अंतर्गत अनुदानावर वितरित केल्या जाणाऱ्या बियाणांची नोंद साधी पोर्टलवर ठेवावी लागणार आहे. त्यामुळे अनुदानावर बियाणे वितरित करणाऱ्या उत्पादक संस्था सहकारी संस्था तसेच कृषी सेवा केंद्र चालकांची डोकेदुखी वाढली आहे शासनाने यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी होत आहे.