गेट टुगेदर जीवावर बेतले; ९ जणांना जलसमाधी

Shabd Sandesh
0
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील हृदयद्रावक घटना

शब्दसंदेश न्यूज नाशिक, दि.०४

आनंदाने स्नेहसंमेलन आटोपून घराकडे निघालेल्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रस्ता सोडून कार थेट शेतातील विहिरीत कोसळल्याने दरगोडे कुटुंबातील ९ सदस्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये ५ निष्पाप विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
दिंडोरीतील शिवाजीनगर भागात असलेल्या एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब आपल्या इर्टिका कारने आले होते. कार्यक्रम संपवून रात्री १० च्या सुमारास हे कुटुंब घराकडे जाण्यासाठी निघाले. मात्र, मंगल कार्यालयापासून काही अंतरावरच चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याशेजारील पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत कोसळली.

पाण्याने भरलेल्या विहिरीमुळे बचावकार्यात अडथळे

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, नगरपंचायतीचे अग्निशामक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात सुरुवातीला मोठे अडथळे आले. मात्र, क्रेन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीतून कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले.

एकाच कुटुंबातील नऊ जणांवर अंत्यसंस्काराची वेळ

या हृदयद्रावक घटनेत सुनील दत्तात्रेय दरगोडे (३५), सुनील दरगोडे (३३) यांच्यासह राखी, आशा, माधुरी श्रावणी दरगोडे यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ७ ते १६ वर्ष वयोगटातील सृष्टी (१६), श्रेयश (११) आणि समृद्धी (७) या मुलांचाही यात समावेश असल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)